कांद्याला भाव मिळण्यासाठी चांदवडमध्ये विरोधकांचे उग्र 'रस्ता रोको' आंदोलन; मुंबई-आग्रा महामार्ग रोखला!

 



प्रतिनिधी  / गणेश ठाकरे चांदवड लासलगाव 

कांद्याचे कोसळणारे भाव आणि शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या या गंभीर प्रश्नांवर आज नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे विविध विरोधी पक्ष आणि शेतकरी क्रांती मोर्चाच्या वतीने 'रस्ता रोको' आंदोलन करण्यात आले. कडाक्याच्या उन्हात सकाळी ९ वाजेपासून सुरू झालेल्या या आंदोलनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या या आंदोलनामुळे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या कित्येक किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या.

​गळ्यात कांद्याच्या माळा घालून सरकारचा निषेध

​दुष्काळी चांदवड तालुक्यात तापलेल्या उन्हाची पर्वा न करता हजारो शेतकरी आणि शेतमजूर या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलकांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा तीव्र निषेध केला आणि जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी काही ठिकाणी वाहनांच्या चाकांतील हवा सोडून वाहतूक पूर्णपणे ठप्प करण्यात आली. दरम्यान, काही शेतकरी संघटना आणि विरोधी पक्ष या आंदोलनापासून दूर राहिल्याचेही पाहायला मिळाले.

​आंदोलकांच्या प्रमुख मागण्या:

​कांद्याला प्रति किलो २४ रुपये हमीभाव मिळावा.

​'नाफेड'ने थेट बाजार समितीमध्ये जाऊन कांद्याची खरेदी करावी.

​यापूर्वी विक्री झालेल्या कांद्याला प्रति क्विंटल १,५०० रुपये अनुदान मिळावे.

​...तर मंत्र्यांना मंत्रालयात फिरकू देणार नाही: अंबादास दानवे

​आंदोलनाचे नेतृत्व करणारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे पत्रकारांशी बोलताना आक्रमक झाले. "या आंदोलनाने कांद्याचा प्रश्न सुटला नाही, तर एकाही मंत्र्याला मंत्रालयात फिरकू दिले जाणार नाही. गरज पडल्यास मंत्रालयावर कांदे फेकण्याचे आंदोलन करू," असा इशारा त्यांनी दिला. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी, "या आंदोलनाच्या धसक्यामुळेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक घेणार आहेत," असा दावा केला.

​निवडणूक संपताच भाव अर्ध्यावर का? : रोहित पवार

​राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारच्या हेतूवर सवाल उपस्थित केला. "निवडणुकीआधी कांद्याला २४ रुपये भाव होता, मग निवडणूक संपताच तो १२ रुपयांवर का घसरला? नाफेड केवळ २ लाख टन कांदा खरेदी करणार आहे, परंतु प्रत्यक्षात किमान ८ ते १० लाख टन खरेदीची गरज आहे. हे आंदोलन इथेच संपणार नाही, तर पुढील काळात मुंबईत 'शेतकऱ्यांचा लॉंग मार्च' काढला जाईल," असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

​दिग्गज नेत्यांची उपस्थिती आणि अटक या आंदोलनात खासदार डॉक्टर शोभा बच्छाव (धुळे), खासदार भास्कर भगरे (दिंडोरी), खासदार राजाभाऊ वाजे (नाशिक), खासदार निलेश लंके (अहमदनगर), आमदार रोहित पवार, अंबादास दानवे आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह मविआचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

​पोलिसांची कारवाई: 

आंदोलनामुळे महामार्गावरील कोंडी वाढल्याने नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी यांनी स्वतः आंदोलकांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या सर्व प्रमुख नेत्यांना ताब्यात घेऊन चांदवड पोलीस ठाण्यात आणले. तिथे कायदेशीर प्रक्रिया आणि चर्चेनंतर सर्वांची सुटका करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता.